Friday 25 April 2014

श्री तुळजाभवानी माता (सप्तऋंगी माता) मंदीर, बुऱ्हाणनगर


महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे बुऱ्हानगर (अहमदनगर) हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचे मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगरहून आणलेल्या पालखीतून सीमोल्लंघन करते आणि येथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते. तब्बल पाचशे वर्षाची परंपरा लाभलेल्या या सासर-माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे विषेश!
पैठणच्या शालिवाहन राजघराण्याला उतरती कळा लागल्यानंतर राजा शंभूराव यांनी देवीची मूर्ती व सिंहासन बुऱ्हानगरला आणून ठेवले. त्यावेळी या ठिकाणचे नाव अंधेरी नगरी होते. याठिकाणी तेलंगा नावाचा राजा होता. देवीची मूर्ती तब्बल ३०० ते ४०० वर्षे याठिकाणी होती. हे राजघराणे प्रथम देवकर व नंतर भगत आडनावाने ओळखले जाऊ लागले. आज या घराण्याचे वंशज अर्जुन किसन भगत हे आहेत. तेलंगा राजा कर्नाटकवर स्वारी करण्यास गेल्यानंतर मूर्ती बरोबर घेऊन गेले. डोंगराळ परिसर असलेल्या चिंचपूर(तुळजापुर) मध्ये मूर्ती सुरक्षेसाठी ठेवली. लढाई चालू असताना तेलंगा राजाचा अंत झाला. आज श्री तुळजा भवानी मातेच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर तेलंगा राजाची समाधी आहे. त्यानंतर बहामनी राजवट सुरु झाल्यावर मूर्ती पुन्हा बुऱ्हानगरला आणली.
अहमदनगरला निजामाचा त्रास होऊ लागल्यावर मूर्ती पुन्हा तुळजापूरला नेण्यात आली. निजामच्या नजरेपासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी जानकोजी देवकर भगत यांनी अपार कष्ट घेतले. निजामाची करडी नजर चुकवत मूर्ती परत नगरला नेली आणि निजाम राजवट संपुष्टात येताच तुळजापुरला आणली गेली. जानकोजी हे देवीचे निस्सीम भक्त होते. त्यांची देवीवर अपार श्रध्दा होती. देवीने त्यांना एकदा मुलीच्या रुपात दर्शन दिले. त्यांनी तिचे नाव कौतुकाने अंबिका ठेवले. या अंबिकाने जानकोजीच्या तेलाच्या व्यवसायात त्यांना सर्वार्थाने मदत केली. या व्यवसायामुळे सावकाराच्या देण्यातून जानकोजी मुक्त झाले. ते श्रीमंत होऊन पंचक्रोशीत प्रसिध्द व्यापारी म्हणून परिचित झाले. बुऱ्हानगरच्या बादशहाची अंबिकेच्या सौंदर्यावर नजर गेली. बादशहाने अंबिकेला आणण्यासाठी सैन्य धाडले. मात्र तिला स्पर्श करण्याचे धाडस कुणाचेच झाले नाही. त्यावेळी अंबिकेने शाप दिला की बुऱ्हानगर निर्मनुष्य होईल. त्यामुळे गावात रोगराई वाढली. अनेक जण गाव सोडून गेले. मात्र जे ख्ररे देवीभक्त होते; ते तेथेच राहिले. त्यानंतर देवीने जाणकोजींना खरे रुप दाखविले व ती लुप्त पावली.
जानकोजी देवीविना वेडेपिसे झाले. ते फिरत तुळजापूरला आले. देवीची करुणा भाकू लागले व ते जीव देणार इतक्यात अंबिका प्रकट झाली. त्यावेळी जानकोजी देवीला म्हणाले, मी जशी तुझी सेवा केली तशी माझ्या पिढ्यानपिढ्यांना ही सेवा लाभावी. त्यावर देवी म्हणाली, तू पाठविलेल्या पालखीतून मी सीमोल्लंघन करीन व पलंगावर पाच दिवस निद्रा करीन. तेव्हापासून आजतागायत या पलंग पालखीच्या सोहळ्यात खंड पडलेला नाही. अहमदनगर पासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या बुऱ्हानगरात भगत (देवकर) घराण्यातील मंडळींनी १९९३ साली स्वखर्चाने शेतजमीन विकून देवीचे मंदिर बांधले. या मंदिराच्या पूजेचे व मानपानाचे अधिकार व व्यवस्था विजय अर्जुन भगत पाहतात.
दरवर्षी नवीन पालखी नगरजवळील हिंगणगावात केली जात होती. त्यानंतर ती राहुरीमध्ये बनविली जात आहे. पोळ्याच्या दुसऱ्यादिवशी पालखीसाठी लागणारे साहित्य अर्जुन भगत पुरवितात. गणेशोत्सवातील अष्टमीपर्यंत पालखी तयार केली जाते. पितृ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पालखी राहुरीतून निघते. ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुका फिरुन घटस्थापनेला हिंगणगावात येते. नंतर दुसऱ्या दिवशी नगर, भिंगार कँप तिसऱ्या माळेला बुऱ्हानगरच्या यात्रेदिवशी दुपारी १२ वाजेपासून ते सायंकाळी ५ पर्यंत पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात. या सोह्ळ्याला हजारो भक्त हजेरी लावतात.
पालखी उचलण्यासाठी पुढील बाजूस कापूरवाडी, वारूळवाडी, बुऱ्हानगर येथील लोक हजेरी लावतात. पाच-सहा तास पालखी खेळविली जाते. पालखीला सर्व अठरा पगड जातीचे लोक हात लावतात. ही प्रथा चारशे ते पाचशे वर्षापासून सुरु आहे. नागरदेवळे गावी पालखी गेल्यावर पुढच्या शिडीस सर्व हरीजन लोक धरतात व मागच्या शिडीस माळी व इतर समाज बांधव धरतात. भिंगार कॅपच्या हद्दीत पालखी गेल्यावर प्रथम ती हरीजन वस्तीवर नेण्यात येते. त्यानंतर भिंगार वेशीच्या आत ब्राम्हण गल्लीतून पालखीच्या ओट्यावर विसावते. दरम्यान त्याच वेळेस पलंग भिंगार मारुती मंदिरात येतो. त्यावेळी पलंग पालखीची भेट होते. भिंगारला मोठी यात्रा भरते.
तब्बल पाचशे वर्षाचा इतिहास प्राप्त असलेली पलंग पालखीची मिरवणूक आजही तुळजापुरकरांसाठी एक आनंददायी आणि सदाबहार सोहळा आहे. या पालखीचे मानकरी येथील पुजारी चंद्रकांत झाडपिडे यांच्या घरी आठ दिवस मुक्कमी असतात.